ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती प्रहार

मुंबई, 03 मार्च : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नारायण भंडारी आणि सुधीर मुनगंटीवार यांची थेट नटसम्राटाशी तुलना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपवर घणाघाती प्रहार करून चांगलाच पळता भुई केला. ‘आमचं काही चुकलं असेल तर नक्की सांगा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका’ असं ठणकावत मुख्यमंत्र्यांनी जोरदार भाषण केलं.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नवा अवतार पाहून भाजप आमदारांची पुरती भंबेरी उडाली.

भाषणाच्या सुरुवातीलच मला सर्वांच्या प्रश्नाची उत्तर देता येणार नाही, प्रत्येक उत्ताराला पूर्ण आधार असणार आहे, असं म्हणत भाजपवर जोरदार आसूड ओढला.

‘सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पाहून मला मी नटसम्राट पाहत असल्याचे भास झाला होता. मी एथोलो, हॅम्लेट असं काही बोलत असल्याचे वाटत होते. शेवट कुणी किंमत देतो का किंमत असं झालं आहे’ असं म्हणत अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.

राज्यपाल यांनी निपष्पातीपणाने भाषण केले आहे. राज्य सरकारची संपूर्ण कारकीर्द मांडली आणि ती सुद्धा मराठी मांडली आहे. पण त्यांनी मांडलेले काही मुद्दे हे त्यांच्या पक्षाच्या लोकांना पचवणे अवघड गेले आहे. अचानक पाऊस आला की आपण भिजून जातो असं काही जणांचे झाले, असं म्हणत भाजपला टोला लगावला.

‘आम्ही थाळी भरून दिली, वाजवायला नाही’

‘पाच रुपयांमध्ये थाळी देण्यात आली. मी राष्ट्रपतींचं भाषण पाहिलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत 8 महिन्यात 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात आले आहे. मग आठ महिन्यानंतर अचानक ते श्रीमंत झाले आहे का, त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरचे दर वाढवले आहे’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आम्ही 5 रुपयांमध्ये शिवभोजनाची थाळी देत आहोत. आम्ही भरलेली थाळी दिली फक्त वाजवण्यासाठी थाळी दिली नाही. गरिबांना विचारा भरलेली थाळी पाहिजे की वाजवायला थाळी पाहिजे, असा थेट सवाल भाजप नेत्यांना विचारला.

‘सुधीर मुनगंटीवार यांची नटसम्राटाशी तुलना’

‘सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पाहून मला मी नटसम्राट पाहत असल्याचे भास झाला होता. मी एथोलो, हॅम्लेट असं काही बोलत असल्याचे वाटत होते. शेवट कुणी किंमत देतो का किंमत असं झालं आहे. तुमच्या भाषणाचा आवेश पाहून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना भीती वाटायला लागली की आमचं काय होणार, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

तसंच, ‘मी सुद्धा फोटोग्राफी करतो. तुमच्यातील कलाही अशीच कायम राहु द्या. ती उचंबून आली पाहिजे. कला कुठेही लपून राहता कामा नये कला ही जन्माजात असली पाहिजे. ती जिवंत असली पाहिजे’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी एकत्र येण्याचे आश्वासन दिले आहे. चला मग दिल्लीत जाऊया कर्नाटक सरकारने कशी बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी माणसावर अन्याय केला, त्याची तक्रार करूया. केंद्राकडे जाऊन कानडीच्या सक्तीबद्दल सांगू, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलं.

. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न देणे हा केंद्राचा करंटेपणा

‘अलीकडे मराठी भाषा दिवस साजरा झाला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडेला आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे काय द्यायचंय ते सगळं दिले आहे. आम्ही काय भिकारी आहोत का कटोरा घेऊन प्रत्येक वेळा दिल्लीच्या दरबारात जायचे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न देणे हा केंद्राचा करंटेपणा आहे’ अशी विखारी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराज विमानतळ नाव कधी देणार’

‘स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या हे दोन वेळा पत्र आहे. भारतरत्न कोण देत असतो, मग इतक्या दिवस का दिले नाही. सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्यात आले आणि आपले नाव दिले, आणि आम्हाला विचारताय औरंगाबादला संभाजीनगर द्या, आणि संभाजीनगर हे नाव नक्की देऊ, पण त्याआधी या विधानसभेत औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचे ठरले होते, त्याची तारीख द्या, आम्हाला हिंदूत्व शिकवू नका’ असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

विरोधकांनी मेरे वतन के लोगो कविता ऐकवलीत आता तुमच्याकडून काही तरी शिकलो म्हणून सांगतो,’ये महाराष्ट्र के लोगो पोछलो आँख का पाणी जो झुठ बोलते हे उनकी खत्म करो बेईमानी’ भाषणात यमक असले म्हणून यशाचे गमक नाही, असं फडणवीस म्हणाले होते. पण आमच्यात कान पिळण्याची आणि काम करण्याची धमक सुद्धा आहे, असं म्हणत ‘मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावे’ कृपा करून सत्य तरी वाचावे’ या समर्थ रामदास स्वामी यांच्या ओळी म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

‘फडणवीस यांची नारायण भंडारीशी तुलना’

कोरोनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पण त्यांना उत्तर देण्याआधी मला लहानपणी नारायण भंडारी याची कथा आठवली. ‘नारायण भंडारी हा गाव सोडून गेलेला असतो तो परत गावात येतो आणि सरांना भेटतो. ओळखला का सर मला, सर म्हणाले तुला कोण नाही ओळखणार. काय बोलतो गांजापासून ते मांजापर्यंत बोलतो. न्यूयार्कपासून ते गावापर्यंत बोलतो. मला आता नवीन गुरू भेटला आहे तिथे जोरात बोलावे लागते. आता मी सरकारच्या कोविड काळातील भ्रष्टाचारावर टीका करून आलोय. आता मला परत पत्रकार परिषद आहे. मगाशी हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता पत्रकार परिषद घेऊन त्यांचे समर्थन करण्यासाठी चाललो आहे. असे हे नारायण भंडारी’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हश्श्या पिकली पण भाजपच्या गोटातील आमदारांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘काय तो मुख्यमंत्री’, असं एका आमदाराने म्हटलं आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारत या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली.

आपण फेसबूक लाईव्हचा उल्लेख केला. मी महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट, रुग्ण संख्या वाढते आहे आज, काय करायचे काही नाही. दुर्देवाने थोड इकडे तिकडे झाले आणि मी पुन्हा येईन म्हणत व्हायरस परत आला, असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला.

‘ज्यांनी नोटबंदीच्यावेळी त्यांची स्तुती केली ते यात काम करत होते. ते अर्थशास्त्राचे डॉक्टर. या आपत्तीच्या काळात अर्थशास्त्राचे डॉक्टर बरे की वैद्यकीय शास्त्राचा कंपाऊंडर बरा. आर्थिक पाहणी अहवालात बिहार आणि इतर राज्याची तुलना करत निष्कर्ष काढला. पण बिहारचा फोलपणा इंडियन एक्सप्रेसने समोर आणला. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या महाराष्ट्र तुम्ही बंद करणार? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना विचारला.

‘पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन केला’

महाराष्ट्रात रुग्णसंख्या आहे आपण ती लपवली नाही. मार्चमध्ये प्रादुर्भाव सुरु झाला, हॉस्पीटल, बेड नव्हते, रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येऊपर्यंत मृत्यू व्हायचा पारदर्शीपणे माहिती दिली. त्यांना बीपी हार्ट प्रॉब्लेम होते. आणि नंतर त्यांना करोना झाल्याचे ही दिसून आले. पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन केला. मी त्यांना फोन केला. लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न करा, मजुरांना जाण्यासाठी ट्रेन द्या पण तेंव्हा त्यांनी काही नाही केले. लॉकडाऊन केले आणि मग लाखो लोकं घरी जात असतांना तांडेच्या तांडे पायी गेले. या लोकांना मोफत अन्नधान्य दिले, त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली. आपापल्या राज्यात गेल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांनी इथे उगीच आलो, महाराष्ट्राने यापेक्षा आमची काळजी घेतली असे प्रशंसोद्गार काढले, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

‘आमदारांचा फंड दिल्लीला दिला’

आमच्याकडे कोविडचा हिशोब विचारता, जरुर विचारा. महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी उपायोजना कराव्या लागतात तेंव्हा आपल्या आमदारांचा फंड महाराष्ट्राला न देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता दिल्लीला दिला, ज्यांनी तो दिला त्यांना धन्यवाद, मला माझी लाज वाटायला लागली होती, असा टोलाही ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.

पीएम केअर फंडचा हिशोब कोण देणार, त्यांना विचारायचे नाही, हा फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. आणि कुणी धाडस करून विचारलं की काय? असा सवालही त्यांनी विचारला.

‘शेटजी नसतील तर अर्थचक्र चालणार नाही’

संसर्गाची साखळी तोडण्याठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय. पण ती आमची इच्छा नाही. गोरगरिबाची चुल बंद करायची नाही. गॅस वाढत चालल्याने चुल म्हटलो.. आत्मनिर्भर भारतात गरीबाला ही तेवढीच ताकत मिळाली पाहिजे. शेटजी नसतील तर अर्थचक्र चालणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर निशाणा साधला.

‘मला व्हिलन ठरवले तरी चालेल…’

‘आरोग्य सुविधा वाढवत आहोत, जर्मनी, इटलीसारख्या अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन केले. आपण सावधपणे पुढे जात आहोत, गरीबांची चुल विझवायची नाही म्हणून “मी जबाबदार”… मी कुटुंब तर माझे कुटूंब सुरक्षित” मला व्हिलन ठरवले तरी चालेल,वाईट म्हटले चालले तरी मला पर्वा नाही. मी माझ्या राज्याशी बांधील आहे. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य. काही चुकीचे होत असेल तर नक्की कारवाई करू, संकटाशी खेळ करू नका. आमदार खासदार मृत्यूमुखी पडले. हा व्हायरस कुणाला ओळखत नाही. थट्टा कुणाची करता, माझे कुटुंब माझी जबाबदारीची थट्टा करताय, करा, पण सामान्यांच्या जीवाशी खेळू नका, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

दिल्लीच्या टीमला आम्ही कुठे कमी पडतो का सांगा, ते म्हणाले यंत्रणा थकलेली. लॉकडाऊन होते तेंव्हा घराघरात जाऊन चौकशी करणे सोपे पण आता कुटुंब च्या कुटुंब घराबाहेर पडत असतांना त्यांची चौकशी करणे कठीण आहे. लॉकडाऊन टाळायचे असेल तर त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक, व्हॅक्सीन घेतले तरी. मास्क वापरा,हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा ही त्रिसुत्री आहे. लस नोंदणी ॲपमध्ये त्रुटी… पण म्हणून मी टीका करणार नाही. कारण काम केली तर चुक होते, लसीकरणाची केंद्रे मोजकी न ठेवता खासगी रुग्णालये ज्यांची क्षमता आहे त्यांना परवानगी देण्याची मागणी आपण केंद्राकडे केली. काल २९ रुग्णालयांना मान्यता मिळाली

शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे

‘संत नामदेव मराठी मातीच्या पुत्राने पंजाबात जाऊन काम केले, शेतकऱ्यांसाठी काम केले. आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आहे. जे शेतकरी तिकडे आंदोलनासाठी बसले त्यांची वीज कापली जाते, त्यांची शौचालये तोडली जात आहेत, पाणी तोडले जात आहे, एवढेच नाही तर सार्वभौम देशाच्या राजधानीत ते येऊ नये म्हणून मार्गावर खिळे ठोकले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे ही भूमिका बदलून या सीमेवर खिळे ठोकले असते तर तो देशात घुसला नसता.

‘तुमची मातृसंस्थाही स्वातंत्र्य लढयात नव्हती’

‘शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती पण तुमची मातृसंस्थाही स्वातंत्र्य लढयात नव्हती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केली.

‘विदर्भाला वेगळे होऊ देणार नाही’

पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मार्केट असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी विकेल ते पिकेल मध्ये काम आहे. विदर्भ माझं आजोळ, ते माझ्यापासून तोडण्याचा विचार सोडा. विदर्भाला वेगळे होऊ देणार नाही. ते आम्ही होऊ देणार नाही, अशी गर्जनाच मुख्यमंत्र्यांनी केली.

‘बाबरी पाडतांना येरेगबाळे पळून गेले’

बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली. त्यांना विसरला नाहीत. धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरू नका. बाबरी पाडतांना येरेगबाळे पळून गेले. बाळासाहेब राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मलाअभिमान आहे. आणि हे म्हणाले आम्ही नाही पाडले. राममंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता. पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा आग्रह आहे, असंही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

‘तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता’

काश्मिर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेंव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले. आमचे हिंदुत्व काढत असतांना काश्मिरमध्ये फुटीरतावादांबरोबर सत्ता स्थापन केली तेंव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही. बाळासाहेबांच्या खोलीत बंद दरवाजाआड पुढच्या वाटचालीची चर्चा केली, तेंव्हा देवेंद्र तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्व, असा थेट सवाल फडणवीस यांना विचारला.

‘उस्मानीला पकडणाच’

सर्जल उस्मानी बद्दल बोलतांना आम्ही तो पाताळात गेलो तरी शोधून काढू म्हटले. उत्तरप्रदेशात अशा पिल्लावळीचे पोषण होत असेल आणि पाया ठिसुळ असेल तर मंदीर कसे बांधणार आहात. आम्ही उस्मानीला पकडणाच म्हणजे पकडणारच, असं आश्वासनही त्यांनी दिले.

जलयुक्त शिवार योजनेवरून टीका

‘शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्याप्रमाणात राबवणार आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना होती. कॅग चा रिपोर्ट काय सांगतो पहा, कॅगच्या अहवाल मानायचा नसेल तर ती रद्द करा. केंद्राचा आर्थिक पहाणी अहवाल आपण मानतो, मग कॅगचा अहवाल का नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.

‘मेट्रो प्रकल्प दोन्ही सरकारचा तर खेचाखेची कशाला’

मेट्रो तीनला स्टॅबलिंगलाईन नाही. खर्च वाढला आहे. याला स्थगिती नाही तरी किंमत १० हजार कोटी रुपयांनी वाढली.

आम्ही काही ही केले नाही. पण खर्च करण्याआधी टेंडर काढण्याची परवानगी नको. लाईन ६ चे टेंडर काढले पण डेपोच नाही म्हणजे कालवे आहेत आणि धरणेच नाहीत. आरेची कारशेड काही वर्षांनी ती अपुरी पडणार, मेट्रो ४, ४ ए आणि ३ ची लाईन एकत्र करू या. त्यामुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल. कांजूरमार्ग जागा केंद्र म्हणजे त्यांची, राज्य म्हणते त्याची., सीमा प्रश्नी जसे एकत्र येता तसे लोकहितासाठी एकत्र या, मेट्रो प्रकल्प दोन्ही सरकारचा तर खेचाखेची कशाला, एकत्र बसून मार्ग काढू, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

खर्च ही आगडबंब होत नाही आणि जो खर्च होईल ती पुढच्या 50 वर्षापर्यंतची गरज भागवण्यासाठी होईल. कृपा करून यात राजकारण करू नका. मेट्रोत आपल्याला एकत्र जाण्याची संधी मिळेल, असं थेट आवाहन मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना केले.

‘गुजरातमध्ये आभासी गुंतवणूक’

गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे दिसते, तिथे होऊ द्या पण ती किती फसवी ते सांगतो. नीती आयोगाच्या बैठकीत धोरण ठरवण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले होते. राज्यातली स्पर्धा खड्डयात घालणारी गुजरातमध्ये आभासी गुंतवणूक आहे. कंपनीचे शेअर घेतले ते उपभोक्ता कंपनीसाठी नाही

गुजरातमध्ये जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात १ लाख १६ हजार ५११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात काही विदेशी कंपन्यांनी या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत. ही गुंतवणूक कंपनीमध्ये झाली आहे. उत्पादक उद्योगात नाही. हे येथे स्पष्ट करणे गरजेचे आहे, असंही ठाकरे म्हणाले.

‘एकत्र काम करू आणि महाराष्ट्राला समृद्ध करू’

‘चुकत असू तर नक्की वाभाडे काढा, चुकत असेल तर सांगा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका. तुमच्याकडून राज्यात गुंतवणूक येत असेल तर तीही करायला हरकत नाही. शिवभोजन पाठ थोपटवून घेणारी नसली तरी पोट भरणारी योजना आहे. आमच्या योजनांचे वाभाडे काढले, गॅसच्या किंमती वाढल्या, उज्वला गॅस योजनेचे काय झाले खोट बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण आहे. प्रश्न विचारला तर तो देशद्रोही असूच शकेल असे नाही. आम्ही ब्रम्हदेवाचा अवतार आहोत असा आमचा दावा नाही, जिथे कमी तिथे जरूर सुचना द्या. कठीण परिस्थिती जगभर. पण त्या कठीण परिस्थितीत अभिमान नसेल तर समाधान ठेवा, महाराष्ट्राचा अभिमान ठेवा. जे केले ते सगळेच शुन्य आहे असं समजू नका. शांतपणे ऐकू, समजून घेऊ, एकत्र काम करू आणि महाराष्ट्राला समृद्ध करू, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं.