ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण:1मार्चपासून नोंदणी सुरू

राज्यात सध्या दररोज 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण करण्यात येत असून आतापर्यंत 5 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू होऊ शकते असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 652 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवडय़ाला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत कोविन पोर्टलवर 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱयांची नोंदणी झाली असून त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण झाले आहे.

5 लाख 47 हजार फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी 41 हजार 453 जणांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती व ज्यांना सहव्याधी आहे अशा 50 वर्षांखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे 1 मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

लसीचे दुष्परिणाम नाहीत

राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरू असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

error: Content is protected !!