महाराष्ट्रमुंबई

दिवाळीनंतरच वाजणार शाळेची घंटा:शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत असले तरी शाळा सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा यालाच राज्य सरकारचे प्राधान्य राहील. त्यामुळे सध्यातरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याचेही त्या म्हणाल्या.

विविध जिह्यांतील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येणार आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांचा शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
फी उकळणाऱया शाळांची तक्रार करा

कोरोनाच्या प्रादुर्भावाने पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याने त्यांना टप्पाटप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आली आहे. जर विद्यार्थी फी भरू शकला नाही तरी शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल असा इशाराही शिक्षणमंत्र्यांनी दिला. तसेच अशा शाळांविरोधात स्थानिक शिक्षणाधिकाऱयांकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी पालकांना केले.

अकरावी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया मराठा आंदोलनाच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे कॉलेज सुरू व्हायला वेळ लागत आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.