महाराष्ट्रमुंबई

ग्राहकांना दिलासा:आता 7 ते रात्री10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार

मुंबई 07 ऑक्टोबर: रेस्टॉरंट्स आणि बार उघडायला परवानगी दिल्यानंतर ग्राहकांचा प्रितिसाद मिळू लागला आहे. ग्राहक आणि हॉटेल मालकांच्या विनंती नंतर सरकारने आता हॉटेल्स, रेस्टोरंट्स आणि बार उघडे ठेवण्याच्या वेळांमध्ये वाढ केली आहे. आधी सकाळी 8 ते सायंकाळ 7 अशी वेळ होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. आता 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत.

रेस्टोर्ंट आणि बारच्या वेळा वाढवाव्यात अशी मागणी संबधित व्यवसायिक संघटनांची होती त्यानुसार सरकारने नवा आदेश काढला आहे.

स्थानिक महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.
हॉटेल मालकांनी आणि ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारने याआधीच जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.
खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी.

संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी.

काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे – खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे.

कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा. टेबलांच्यामध्ये किमान 1 मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा. ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे. मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा.

शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री – प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तु, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत.
भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत. ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजुला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डस, डार्टस्, व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल.

इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमला मनाई असेल. सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. एन ९५ किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!