महाराष्ट्रमुंबई

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय:राज्यात 12 हजार 500 पोलिसांची होणार भरती

मुंबई, 16 सप्टेंबर : महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.

कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. तब्बल साडे बारा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोविडची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या.

पोलीस भरतीबाबत सरकारने आज अधिकृत घोषणा केल्याने बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली होती. मात्र आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळाल्याने बेरोजगार तरुणांने समाधान व्यक्त केलं आहे.