सुप्रीम कोर्टात आज सुनावणी;आरक्षण लढाईचा आज पाचवा दिवस
मराठा बांधवांनी मुंबईमध्ये उभारलेल्या आरक्षणाच्या लढाईचा आजचा पाचवा दिवस आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे.
दुसरीकडे हायकोर्टाने मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे तसेच फक्त आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. आजही सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होणार असून कोर्ट काय आदेश तदेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हुल्लडबाजीवर पाटील संतापले
‘मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाचे आदेशांचे पालन करायचे आहे. सर्व आंदोलकांनी आझाद मैदानावर झोपायचे आहे. पार्किंगसाठी पोलिसांनी ठरवून दिलेल्या मैदानावर गाड्या लावा आणि त्या मैदानावरच झोपा.आझाद मैदानावर झोपण्यासाठी जागा मिळाली नाहीतर क्रॉस मैदानावर जा.कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. गोंधळ घालणाऱ्यांची मला गरज नाही. समाजाची मान खाली जाईल,असे वागू नका. मराठ्यांचा अभिमान वाटावा, असे वर्तन करा,” असे सांगत कार्यकर्त्यांना जरांगे पाटील यांनी चांगलाच दम भरला.
सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याची शक्यता
मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्यामुळेच आता सरकार थेट हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या हालचाली करत आहे.
महाधिवक्त्यांशी चर्चा करून गॅझेटियच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यास ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण होत नाही, असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलयं.
राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर काढण्याच्या तयारीत आहे. तसचं कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या अॅफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरु आहे.
दरम्यान कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची चर्चा आहे
दरम्यान जरांगेंनीही सरसकट आरक्षण शब्द काढा, मात्र हैदराबाद गॅझेटमुळे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केलीय
त्यावर सरकार कोणता मध्यममार्ग काढणार याचीच उत्सुकता आहे.
