मनोज जरांगे पाटील मुंबईतील मोर्चावर ठाम;अंतरवाली सराटीच्या वेशीवर बंदोबस्त वाढवला
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची हाक दिल्यानंतर सरकारी पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये मराठा मोर्चाबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोर्चा काढू नये, अशी विनंती केली. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारने आम्हाला एक कोणताही मार्ग द्यावा. त्या मार्गाने आम्ही जाऊ, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मराठा मोर्चावर ठाम असल्याचे सांगितले.
बीड येथील जमाबंदीच्या आदेशानंतर अंतरवली सराटीच्या वेशीवर आणि वडीगोद्री येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी गेवराई येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेकही झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी उपोषण आंदोलन झालेल्या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानंतर वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीच्या वेशीवर RCP आणि SRPF च्या प्रत्येकी दोन कंपन्या ,5 डी वाय एस पी, 8 पी आय सह 266 अधिकारी कर्मचारी आणि 165 होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी,पुढील 15 दिवस विविध आंदोलने निदर्शनावर बंदी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच काल बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत.एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे.यादरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर देखील मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठाम आहेत. अजून बोललोच नाही. तुमच्या समोरच चर्चा करणार, असं मनोज जरांगेंनी सांगितले. एक रस्ता आम्हाला द्या..कोणताही द्या…हजार रस्ते आहेत. एक द्या..मी मोर्चावर ठाम..अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, अंमलबजावणी करा…, असं मनोज जरांगे म्हणाले. तीन महिन्यांचा वेळ द्या म्हणाले होते. परंतु उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आणि कुणबी एक आहेत,याचे सरकारी दस्ताऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत.मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप वगैरे कशाला हवा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो.त्यांनी कधी इतकी फुलं बघितली नसतील, वास मारणारी,बिगरवासाची सगळी फुलं आणतो. फडणवीस साहेबांचा बंगला नाय गुलाबाच्या पाकळ्यांनी भरुन काढला तर नाव बदलेन माझं.उगाच गोरगरीबांच्या लेकरांची का नाराजी घेता? मला जेलमध्ये टाका,मी सडायला तयार आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले,तुम्हाला आरक्षण देतो,तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या, तरीही मी तयार आहे,असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
