ऑनलाइन वृत्तसेवा

ठिबक सिंचनाला आता 75 व 80 टक्के अनुदान-कृषि मंत्री दादाजी भुसे

मुंबई:- शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यात येत होते. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान कमाल 5 हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी फिली आहे.

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण 246 तालुक्‍यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित 106 तालुक्‍यांचा समावेश करुन ही योजना राज्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 25.72 लक्ष हेक्‍टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल.

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता रु.589 कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना “मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार आहे. अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले असून, त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *