ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येक महिन्याला मिळणार ५ हजार रुपये मानधन

मुंबई : करोना काळामध्ये वारकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना मानधनाच्या रूपात शासनाने मदत करावी अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने लावून धरली होती. या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये सरकारकडून मानधन मिळणार आहे. विधान भवनात झालेल्या संत पीठ बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित (भैय्या) देशमुख यांनी वारकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आहे.


महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या विधान भवनात भव्य संत पीठ बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संत पीठ उभे राहावे या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या बैठकीत केल्या. त्यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित भैया देशमुख यांनी केली.


विशेष म्हणजे समाजमन दुरुस्तीचं काम करणाऱ्या वारकऱ्यांचे प्रतिबिंब राज्य घटनेच्या पहिल्या पानावर ही उमटले आहे, अशा भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केल्या. काळाच्या ओघात संत पीठ ही संकल्पना बाजूला बाजूला गेली होती, पण वारकरी साहित्य परिषदेच्या रुपान या विषयाला बळ मिळाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार ही याबाबत सकारात्मक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्याबाबत आराखडा तयार केला जाईल असेही थोरात म्हणाले. विशेष म्हणजे वारकऱ्यांना मानधन देण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वारकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील असेही थोरात यांनी सांगितले.

आपल्या जगण्या वागण्यातून माणुसकीची शिकवण देत समाजाला दिशा देण्याचं काम करणारे वारकरी खरे ब्रँड अॅम्बेसिटर आहेत. अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली. जगाच्या पाठीवर सगळ्यांना महान केलं अशा संतांना काही मागण्याची वेळ येत असेल तर ही दुःखाची बाब असल्याची भावनाही नाना पटोले यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे महा विकास आघाडीचे सरकार वारकऱ्यांचा कायम सोबत राहील असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.
या बैठकीला वारकरी परिषदेचे राज्यभरातील सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील सचिव डॉक्टर सदानंद मोरे आणि सर्व वारकरी संप्रदायाचे निगडित प्रमुख व्यक्तीही यावेळी उपस्थित होत्या.
राज्यकर्त्यांकडून मंदिर उघडा या मागण्यासाठी आंदोलन सुरू असताना, महाराष्ट्रातील वारकर्‍यांनी मात्र मंदिर उघडण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी असे म्हणत परमेश्वर प्रत्येक माणसामाणसात आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या वारकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका अन्यथा वारकरीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या बैठकीवेळी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *