ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

सर्वसामान्यांचा विचार करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करा-देवेंद्र फडणवीस

राज्यात ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक वीकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध लादण्यात आले असून त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. सरकारने जे निर्बंध लादले आहेत तो एकप्रकारे महिनाभराचा अघोषित लॉकडाऊन आहे. त्यामुळे जनमानसात अस्वस्थता वाढत चालली असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी व सामान्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र लिहिलं. त्यात लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या दूरध्वनीचा संदर्भ देत फडणवीस यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही त्यास सहमती दर्शवली होती. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृष्य निर्बंध घालण्यात आलेत ते पाहता जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी तर लोक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.


नवे निर्बंध घालताना सरकारकडून विविध क्षेत्रांचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत आहे. अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे फटका बसणार आहे. ज्या प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत ते पाहता हा एकप्रकारे महिनाभराचा अघोषित लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल व्यावसायिक, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी पुढे नमूद केले आहे.


निर्बंध निश्चित करताना अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास वाहतूक खुली ठेवताना गॅरेजे आणि स्पेअर पार्ट्सची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. अन्य काही बाबतीतही असाच विरोधाभास दिसत आहे. त्यामुळे वेळीच त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सरकारने पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा द्यायला हवा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करायला हवी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्रात केली आहे. करोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच पण करोना संसर्गाला रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. याबाबत आपण योग्य ती पावले उचलाल अशी अपेक्षा आहे, असेही फडणवीस यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.