औरंगाबाद

जायकवाडी धरण तुंडुब भरले :दोन दरवाजे अर्धा फुट उघडले

पैठण । जायकवाडी धरण तुंडुब भरले असुन शनिवारी दुपारी जायकवाडीच्या 27 दरवाज्यांपैकी दोन दरवाजे अर्धा फुट वर उचलून एक हजार क्युसेस या वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पुजा श्रीफळ फोडुन धरणाचे दरवाजे वर उचलण्यात आले. धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल असे जायकवाडी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यातील शेती सिचंनासाठी सोबतच उद्योगासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण यंदाही तुंडुब भरले आहे.
आज धरणात पाण्याची आवक सुरुच असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी बारा वाजता धरणाच्या 10 व 27 क्रमांकांचे दोन दरवाजे अर्धा फुट वर उचलून एक हजार क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. यंदाही धरण तुंडूब भरल्याने मराठवाड्यातील जनतेला दिलासा मिळाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर शेती सिंचनाला आणि औद्योगिक वसाहतीला वर्षभर पाणी मिळणार आहे.