जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवणुका आधी होणार;पालिका निवडणूक जानेवारीत
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, डिसेंबर अखेरीस वा जानेवारीच्या सुरुवातीला नगरपालिका आणि जानेवारीच्या अखेरीस महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची योजना आहे.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, नगरपालिका व नगरपंचायती आणि शेवटी महानगरपालिका अशा तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाने तशी तयारी केली आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील गट आणि गण अंतिम करण्यात आले आहेत.
गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पुढील टप्प्यात गट आणि गणाच्या आरक्षणाची सोडत आता काढली जाईल. यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वात आधी घेतल्या जातील. ग्रामीण महाराष्ट्राचा कल कोणत्या दिशेने आहे याचा सर्वच राजकीय पक्षांना अंदाज येऊ शकेल. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील. सर्वात शेवटी सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱया महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजेल.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर २०० पेक्षा अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होतील. नगरपालिकांच्या प्रभागांची रचना करण्याची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत आहे. परिणामी नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये घेतल्या जाऊ शकतात. मुंबईसह २९ महानगरपालिकांमध्ये प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्याची मुदत ही १३ ऑक्टोबरपर्यंत आहे.
१ ते १० डिसेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा
महापालिका निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा १ ते १० डिसेंबरदरम्यान केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया ४५ दिवसांच्या आत पूर्ण करायची असल्याने १० डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परिणामी डिसेंबर २०२५ मध्येच निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांकडे आता तयारीसाठी तीन महिन्यांचा कालावधी असणार असून, नवरात्रीचा मुहूर्त साधत अनेकांना प्रचाराचा नारळ फोडावा लागणार आहे.
