मराठा बांधवांनो आता आरपारची लढाई आहे;संयम सोडू नका-मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. “आता ही आरपारची लढाई आहे, कितीही दिवस लागले तरी संघर्ष सुरूच राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.गणेशोत्सवाला गालबोट लागेल असे काहीही करणार नाही, आमचे आंदोलन पूर्णपणे शांततेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, “न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो. आपली चूक झाकण्यासाठी सरकारकडून देव-देवतांना पुढे केले जात आहे. विनाकारण आपली अडवणूक केली जात आहे. कालच याचिका दाखल झाली आणि लगेच कालच निकाल आला. याचा अर्थ समाजाला आरक्षण देणे त्यांच्या जीवावर आले आहे. आपले वकील न्यायालयात जातील आणि आपल्याला नक्कीच परवानगी मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम ढळू न देण्याचे आवाहन केले.
शेकडो आत्महत्या फडणवीस यांच्यामुळे झाल्या, असे म्हणत जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच समाजातीतल कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.

जरांगे पाटील यांनी सरकारकडे असलेल्या मागण्यांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. सगेसोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेण्यात याव्यात, आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी, कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, यासह इतरत मागण्यांची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आमची कधीही चर्चेची तयारी आहे. त्यांचा रात्री फोन आला आणि मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने शिष्टमंडळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी चर्चा होईल.” मात्र, आता फक्त चर्चेवर विश्वास ठेवायचा नाही, लेखी दिले तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही, आता थेट अंमलबजावणीच हवी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. चर्चेसाठी कोणीही आले तरी त्यांचा सन्मान करायचा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
मुंबईतील आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांनी 40 अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. या अटींमध्ये प्रवासात आक्षेपार्ह घोषणा किंवा जातीय तेढ निर्माण करणारी विधाने केली जाऊ नयेत, प्रवासाचा मार्ग निश्चित केलेल्या मार्गाप्रमाणेच राहील, तो बदलला जाणार नाही, प्रवासादरम्यान रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी, खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आयोजक आणि आंदोलनकर्त्यांना करावी लागेल, सहभागी नागरिकांनी कोणतेही घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगू नये, अशा 40 अटींचा समावेश आहे.
