एकाचवेळी सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार का?आयोगाने दिली माहिती
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीची ही आढावा बैठक होती. या बैठकीनंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न आहे. ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यामुळे अनेक वर्ष या निवडणुका रखडल्या आहेत. पण कोर्टाने ओबीसींचं 27 टक्के आरक्षण ठेवत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. तसेच प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात आता स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लगबग सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार?
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घेणार? याबाबत महत्त्वाची माहिती दिली. राज्यात दिवाळीनंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकाचवेळी सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार नाहीत
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी राज्यात एकाचवेळी विविध शहरांच्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या, जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेता येणार नाहीत, असं सांगितलं. कारण एकत्र निवडणुका घेण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचं त्यांनी सांगितलं.
निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही
राज्य पातळीवरच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जात नाही, असं राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. त्यामुळे यावेळीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन का वापरणार नाही, याबाबतही निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक भागासाठी उमेदवार निवडून द्यायचा असतो. यामुळे ही प्रक्रिया वेळकाढूपणाची आहे, असं राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती सरकारने ठरवलेल्या नव्या प्रभाग रचनेनुसारच घेतल्या जातील, असं म्हटलं आहे. प्रभागरचना करण्याचा अधिकार त्या त्या राज्यातील सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्या नियमानुसारच प्रभागरचना ठरेल आणि निवडणुका होतील, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोग स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागलं आहे तसं प्रत्येक पक्षदेखील कामाला लागले आहेत. आगामी काळात घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
