ऑनलाइन वृत्तसेवा

अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळणार

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अशा अपात्र महिलांची संख्या पाच लाख असल्याचे त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची माहितीही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे या पाच लाख अपात्र महिलांमुळे राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये डिसेंबर २०२४ असे सहा महिन्यांचे प्रत्येक १५०० रुपये या अपात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र, आता अपात्र ठरल्यानंतरही हे पैसे परत घेतले जाणार नसल्याने सरकारला तब्बल ४५० कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचं बोललं जातं आहे. महत्त्वाचे म्हणजे आणखी ११ लाख महिलांची पडताळणी बाकी असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या महिलांना ठरवलंय अपात्र?

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या २ लाख ३० हजार आहे. तर वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या १ लाख १० हजार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या १ लाख ६० हजार आहे, अशा एकूण पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

लाडक्या बहीण योजनेची पडताळणी

महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पडताळणीसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जात आहे. यानुसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीची आणि चारचाकी वाहनांच्या मालकीची तपासणी केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.

कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.

संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *