ऑनलाइन वृत्तसेवा

घाबरण्याचे कारण नाही;कुठलेही निर्बंध नाहीत,फक्त मास्क वापरा काळजी घ्या

करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

राज्यातील करोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये करोना विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत करोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावाही यावेळी घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

जगातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून करोना अनुरूप वर्तन पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी करोना परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ करोना रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोना अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या नव्या विषाणूची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *