केजबीड

नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन:मांजरा धरण भरले

आपत्कालीन परिस्थिती तालुका प्रशासनाकडे संपर्क साधावा

बीड, दि. 15 (जि. मा. का.) : मागील काही दिवसातील दिवसात होत असलेल्या पावसामुळे मांजरा प्रकल्प 97.10% क्षमतेने भरले असून, धरणात अजून येवा सुरू असून मांजरा प्रकल्पातून केव्हाही नदीमार्गे विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील इतर मध्यम/ लघु प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येऊन मांजरा नदीवरील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसात चांगल्या पावसाची शक्यता असल्याने त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावाने सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संभाव्य परिस्थितीत व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. मुसळधार पाऊस सुरू असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये. जिल्ह्यातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने कोणीही जलसाठे पाहण्यासाठी व पर्यटनासाठी जाऊ नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. आपल्या गरजेच्या वस्तू (उदा. औषधी, रोख रक्कम) स्वतःजवळ बाळगावे. नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. मुक्या जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सदर कालावधीत वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.

विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली पाण्याच्या स्त्रोताजवळ विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ अथवा नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरून, नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास संपर्क साधावेत.स्थानिक पोलीस अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामसेवक ,सरपंच कृषी सहाय्यक (शहरी भागात न.पा.,न.प. यांचे अधिकारी) यांच्याशी संपर्कात राहून ते देत असलेले सूचनांचे पालन करावे. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावकऱ्यांना सावधगिरीची सूचना देवून आपत्तीतील उपाययोजना करावी असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *