महाराष्ट्रमुंबई

नगरपालिका निवडणुका स्थगित:आचारसंहितापण रद्द,19 जुलैला पुढची सुनावणी

मुंबई : निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या.

त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती. या मागणीचा विचार करता निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका 18 आणि 19 ऑगस्टला नियोजित होत्या. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार होते. तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार होती. पण या निवडणुकीवरुन ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले जात होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका होवू नये, अशी मागणी केली जात होती. दुसरीकडे पावसाचा मुद्दा उपस्थित करत काही राजकीय पक्षांनी या निवडणुकीला पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 12 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात 12 जुलै 2022 रोजी सुनावणी झाली. समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला; तसेच 19 जुलै 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी आता आचारसंहिता लागू राहणार नाही. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

निवडणुका रद्द झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे:

‘अ’ वर्ग : जळगाव- भुसावळ. पुणे- बारामती. सोलापूर- बार्शी. जालना- जालना. बीड- बीड आणि उस्मानाबाद- उस्मानाबाद.

‘ब’ वर्ग: नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला. धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर. पुणे- चाकण व दौंड. सातारा- कराड व फलटण. सांगली- इस्लामपूर व विटा. सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज. कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण. बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ. लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.

‘क’ वर्ग: नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद. जालना- अंबड, भोकरदन व परतूर. बीड- गेवराई व किल्ले धारूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.

नगरपंचायती: अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *