ऑनलाइन वृत्तसेवा

मोठी बातमी:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. देशमुख यांची सोमवारी १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीच्या रडारवर होते. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती.

देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरे, कार्यालये व अन्य संस्थांवर ईडीनं अनेक वेळा धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, करोना, वय आणि आजारपणाचं कारण देत सुरुवातीला त्यांनी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतरही ईडीनं त्यांना चार वेळा समन्स बजावलं. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यावरून प्रचंड गदारोळ उडाला होता. माजी गृहमंत्रीच गायब असल्यामुळं राज्य सरकारचीही कोंडी झाली होती.(म टा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *