ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल:100 गुणांचं होणार मूल्यमापन-शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल.

मूल्यमापनातील 100 गुणांची विभागणी कशी असेल?

दहावीच्या लेखी परीक्षेला – 30 गुण
गृहपाठ, तोंडी परीक्षेला – 20 गुण
नववीच्या अंतर्गत परीक्षेला – 50 गुण
100 गुणांच्या मूल्यमापन पद्धतीत विद्यार्थी समाधानी नसेल, तर बोर्डाच्या दोन परीक्षांच्या संधी मिळतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली.

या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार राज्यातील कोरोना आरोग्य संकटाची सद्यपरिस्थिती, दहावीच्या निकालाचे निकष, अकरावीचे प्रवेश कसे होणार? आणि बारावीच्या परीक्षा कधी घेणार? यासंदर्भात आपली भूमिका मांडणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत असताना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे निकष ठरवणारा शासन निर्णय सुद्धा शालेय शिक्षण विभाग आज जारी करण्याची शक्यता आहे असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे दहावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर होईल याबाबतही आज चित्र स्पष्ट होऊ शकतं.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग कशापद्धतीने वाढतो आहे हे आपण पाहतोय. यात मुलांना धोका जास्त आहे. तसंच संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाला कोरोनाची राज्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा सांगू. शासनाची भूमिका आम्ही शुक्रवारी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मांडू. तसंच शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात येईल.”

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रही अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने तसंच 13 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने पुढील लगेच काही दिवसांत तरी बारावीच्या परीक्षा होणे शक्य नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी माध्यमाशी बोलताना दिली.

केंद्र सरकारने बारावीच्या परीक्षांसाठी ‘नो एक्झामिनेशन रुट’ याचा विचार करावा अशी सूचना महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पुढे ढकललेल्या बारावीच्या परीक्षांवरही आता प्रश्नचिन्ह आहे.

दहावीचे मूल्यमापन कसे होणार?

दहावीचे मूल्यमापन म्हणजेच विद्यार्थ्यांना मार्क कसे द्यायचे यासाठी राज्य सरकार विविध पर्यायांची चाचपणी करत आहे.

यासाठी नववी आणि दहावीच्या शालांतर्गत परीक्षांच्या आधारे दहावीचा अंतिम निकाल जाहीर करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. यानुसार, नववीच्या चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा आणि दहावीची चाचणी, तोंडी आणि पूर्व परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाऊ शकतात.

यासंगर्भातील शासन निर्णय आज किंवा उद्या जाहीर होईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

दहावीच्या मूल्यमापनाच्या निकषांसोबतच अकरावीचे प्रवेश याच निकालाच्या आधारावर करण्यात येणार की यासाठी राज्य सरकार वेगळे नियम जाहीर करणार हे पहाणं आता महत्त्वाचे ठरेल.

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करणार? असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या आठवड्यात फटकारलं होतं.

अकरावीचे प्रवेश कसे होणार असाही प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. त्यामुळे राज्य सरकारनच्या प्रतिज्ञापत्रानंतर मुंबई उच्च न्यायालय दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय देणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!