देशनवी दिल्ली

शेतकरी आंदोलक थेट पोहचले लालकिल्ल्यात:मोर्चाला हिंसक वळण

नवी दिल्ली, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता.
त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यात दाखल झाले असून तिरंगा फडकावला आहे.

किसान मजदूर संघर्ष समितीमधील आंदोलक मुकरबा चौक येथे पोहोचले. तिथून या आंदोलकांनी कांजवाला येथे जाणे अपेक्षित होते. पण बॅरिकेडस मोडून हे शेतकरी आता रिंग रोडच्या दिशेने चालले.
या मोर्चाला हिंसक वळण लागले असून सात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याच्याही बातम्या येत आहे. पोलिसांकडून अश्रूधुर चालवण्याच्या बंदुकाही हिसकावून घेण्यात आल्या.

error: Content is protected !!