औरंगाबादवृत्तसेवा

जायकवाडीची पाणी पातळी ८७ %:गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येत्या काही दिवसात धरण १०० % भरण्याची शक्यता लक्षात घेत तालुका प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरी नदी काठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावा गावात दवंडी, लावुडस्पिकर द्वारे हा इशारा देण्यात आला असल्याची माहीती तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.

धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणातून गोदावरी नदीपाञामध्ये पाणी विसर्ग करण्यात येवू शकतो. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातून ८ हजार ६२० क्युसेक क्षमतेने नवीन पाण्याची आवक सुरू असल्याची माहीती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
१ हजार ५२२ फूट पाणी साठवण क्षमता असलेले नाथसागर पूर्ण क्षमतेनुसार भरण्यासाठी आता केवळ दिड फूट पाण्याची गरज आहे. सायंकाळपर्यंत आवक कमी जास्त प्रमाणात होवुन जायकवाडीची पाणी पातळी ८७ % टक्के पर्यंत होती.