अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 304 गावांची यादी बोगस
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामे सुरू — व्हायरल झालेली गावांची यादी अधिकृत नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
बीड दि. 10 (जिमाका):- बीड जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर, 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे शेतीपिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तालुका स्तरावर सुरू असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनास निधी मागणी जिल्हा प्रशास़नाच्या वतीने तात्काळ करण्यात येईल, याची आवश्यक खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
दरम्यान, समाजमाध्यमांवर बीड जिल्ह्यातील माहे सप्टेंबर, 2025 मधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 304 गावांची यादी व्हायरल होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर यादी प्रशासनामार्फत तयार केलेली नाही. या यादी बाहेरील गावांमध्ये नुकसान झालेले नाही, असा चुकीचा संदेश समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहे.
त्यामुळे याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना स्पष्ट करण्यात येते की, व्हायरल होत असलेली यादी अधिकृत नसून प्रशासनाने ती जारी केलेली नाही.
पंचनामे अद्याप सुरू असून नुकसानीबाबतची माहिती शासनास योग्य मार्गाने सादर केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनास सहकार्य करावे व केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच माहितीचा स्वीकार करावा.
जिल्हा प्रशासन आपल्या नागरिकांच्या पाठीशी आहे व शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात तातडीने योग्य कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
