कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त क्षेत्राची भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून पाहणी…
मौजे कपिलधारवाडी, ता. जि. बीड येथे उद्भवलेल्या भूस्खलनजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मेगो चासी,संचालक व संदिपकुमार शर्मा, वरिष्ठ भूवैज्ञानिक,भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI),पुणे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन तांत्रिक सर्व्हेक्षण केले.
सदर पाहणीनंतर मेगो चासी यांनी दिलेल्या प्राथमिक निरीक्षणानुसार,संबंधित ठिकाणी पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नाही, त्यामुळे विशेषतः बारीक मातीच्या तुकड्यांनी समृद्ध भागात पाण्याचे झिरपणे व भूपृष्ठाखाली साठवण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.या कारणामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरू असून ती काही काळ पुढेही सुरू राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.तसेच,या भागाला बहुआयामी धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले असून,मातीने झाकलेल्या उतारांवरून घसरण होत आहे,काही ठिकाणी मागील उतारांवरून दगड कोसळत आहेत,तर काही भागात नदीच्या प्रवाहामुळे जमिनीची धूप होत आहे.

या परिस्थितीमुळे मुसळधार पावसाच्या काळात बाधित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित करण्यात आले. तथापि, मान्सून मागे हटण्याच्या टप्यात असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल,तसेच स्लाईड क्षेत्राच्या तात्काळ जवळील 3 ते 4 कुटुंबे सर्वाधिक प्रभावित असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले.
उर्वरित गावाला तात्काळ धोका नसल्याचे मूल्यांकन भारतीय भूगर्भ सर्वेक्षण पथकाने केले आहे.या पार्श्वभूमीवर,जिल्हाधिकारी बीड यांनी संबंधित प्रशासनास आवश्यक ती खबरदारी घेऊन पुढील प्रतिबंधात्मक व पुनर्वसनात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी कळविले आहे
