जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता;मॉन्सून आज अंदमानात ?
महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून, निकोबार बेटांवर रविवारपासून (ता. ११) मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने आज (ता. १३) नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान-निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत असल्याने चार ते पाच दिवसांतच मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे.
