ऑनलाइन वृत्तसेवाबीड

आता पाचवीपासून शिकवला जाणार शेती विषय-कृषीमंत्री सत्तारांची माहिती

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा एका धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवला जाणार आहे.

पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाणार आहे. भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील हा यामागचा हेतू असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. या निर्णयामुळं शेती सुधारेल पर्यायनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील असेही सत्तार म्हणाले.

अत्याधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवण्याचे नियोजन केलं आहे. शेतीचे धडे गिरवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावामध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जाणार आहेत. शिक्षकांना देखील काही दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. बहुतेक मुलं मुली ही शेतकऱ्यांची असतात. ही मुले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यांनाचं नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळं त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा धंदा समजावा यासाठी पाचवीपासून शेतीचा विषय शिकवला जाणार असल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे.

शेतात फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या गोष्टी लहानपणापासूनच शिकवल्या तर याचे परिणाम भविष्यात चांगले दिसतील असे सत्तार म्हणाले. दरम्यान, शिक्षकांना जर यासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले तर ते विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं शिकवतील असेही सत्तार यावेळी म्हणाले.

दरम्यान यासबंधीची सर्व माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवू. त्यांचे समाधान झाले तर ते सांगतील. शिक्षणमंत्र्यांशी देखील याबाबत बोलणे केले जाणार आहे. शिक्षणमंत्री यामध्ये शेती विषयक एक तास कसा घेता येईल याबाबतचा निर्णय सांगतील असे सत्तार म्हणाले. याचा ढाचा आम्ही ठरवणार आहोत. पाचवी ते बारावीपर्यंत शेती विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. बेसिक विषय सोडून शेती विषय शिकवला जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सत्तार म्हणाले. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी विभागाची दोन लोक तसेच शिक्षण विभागाची दोन लोक अशी चार लोकांची समिती तयार केली जाईल. ही समिती चारही बाजूनं अभ्यास करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

शिक्षकांना प्रशिक्षण नको:कृषी पदविका धारकांना नियुक्त्या द्या-प्रशांत सुलाखे

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षणात कृषी विषय घेण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून कृषी शिक्षक म्हणून कृषी पदविका धारक विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदविका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सुलाखे यांनी केली आहे

शालेय शिक्षणापासूनच कृषी विषयाचे शिक्षण देण्यात यावे आणि यासाठी कृषी पदविका धारकांना प्राथमिक शिक्षक म्हणून तेथे नियुक्ती द्यावी अशी मागणी आम्ही 1995 पासूनच करत आलो आहोत,कृषी शिक्षण ही काळाची गरज आहे हे आम्ही 27 वर्षांपासून सांगत आलो आहोत,तत्कालीन ग्राम विकासमंत्री आर आर पाटील यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली होती मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला,आजही हजारो कृषी पदविका धारक विद्यार्थी बेरोजगार आहेत,आम्ही वारंवार राज्यभर आंदोलने देखील केली आहेत मात्र कुठल्याही सरकारने याकडे गंभीरपणे बघितले नाही परिणामी शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला गेला आहे,ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ ज्ञान नाही म्हणून इतर कोर्सकडे जाऊ लागले आहेत,सध्याच्या कृषी मंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे मात्र आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यापेक्षा कृषी पदविका धारकांना तेथे शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदविका विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सुलाखे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *