बीड

आ.सतिष चव्हाणांच्या विजयासाठी क्षीरसागरांनी उचलले शिवधनुष्य

अभूतपूर्व मेळाव्यात चव्हाणांच्या विजयावर शिक्कामोर्तब

बीड, दि.२९ (प्रतिनिधी)- क्षीरसागर जे करतील ते मन लावूनच करतील आणि विश्वासाने करतील हा राजकारणातला आजपर्यंतचा अनुभव आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत क्षीरसागरांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असताना क्षीरसागर शांत कसे असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र तवा गरम होवू द्यावा लागतो नंतरच भाकरी भाजल्या जाते हे सुत्र सांगत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. शिवसेनेच्या जंगी मेळाव्याचे आयोजन करत आ.सतिष चव्हाणांच्या विजयासाठी शिवधनुष्य उचलले. बीडमध्ये झालेल्या अभूतपूर्व पदवीधरांच्या मेळाव्यात सतिष चव्हाणांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.


पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारासाठी आज बीडमध्ये क्षीरसागर बंधुंनी पदवीधरांच्या मेळाव्याचे आयोजन केले. युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या टीममुळे अगदी काही तासातच नियोजन लागले आणि शेकडो पदवीधर मेळाव्यात दाखल झाले. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणामध्ये बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आहे. टिमचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. अनेक संकटाचा सामना करत संकटे झेलत कप्तान म्हणून उद्धव ठाकरे यांचा कारभार निश्चितच वाखणण्याजोगा आहे. अनंत अडचणींचा सामना करत ठाकरे सरकार उद्दिष्टय आणि ध्येय गाठण्यासाठी यशस्वी वाटचाल करत आहे. कोरोनाच्या संकटात सरकारने उत्तरदायित्व निभावलं आहे. एका वर्षातील कामकाजाचा लेखाजोखा सर्व काही सांगून जातो. अजूनही अनेक प्रश्न, अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारकडून करून घ्यायचा आहे. पदवीधरांसाठी आणि सुशिक्षित बेकारांसाठी अनेक ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. नोकरदारांसाठी जुनी पेन्शन योजना अत्यंत महत्वाची आहे ती लागू करण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे. नविन भरती होणे आवश्यक आहे. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी लक्ष घालावे लागणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विजेचा प्रश्न आहे. वीज नियमित हवी आहे. जेणेकरून शेतक-यांना रब्बीचा हंगाम पदरात पाडून घेता येईल. मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाचा, पश्चिम वाहिनीच्या नद्यातून वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील नद्यांमध्ये सोडणे ही अत्यंत आव्हानात्मक योजना राबवायची आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईमध्ये हॉस्टेल उभारणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्न आणि समस्या ठाकरे सरकारकडून आणि महाविकास आघाडीकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ कायम ठेवून आ.सतिष चव्हाण यांना विंक्रमी मताने विजयी करायचे आहे. त्यांच्या या विजयात बीडचा वाटा खारीचा नव्हे तर सिंहाचा असला पाहिजे यासाठी शेवटचे दोन दिवस प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्टा करणे गरजेचे आहे. मी मंत्री असताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आग्रहाखातर संभाजीनगरमध्ये पाच उड्डाणपुल निधी नसताना पूर्ण केले. आता तर सरकार आपले आहे. त्याची परतफेड करण्याची ही वेळ आली. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

तत्पूर्वी आ.विक्रम काळे, राजू वैद्य,नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्याच्या पाठिशी
शिवसेना खंबीरपणे उभी आहे-खैरे

मराठवाड्यावर संकटावर संकटे येवून गेली. या संकटाच्या मालिकेत गरिब, दिनदुबळ्या शेतक-यांच्या पाठिशी मदतीचा हात घेवून उभी राहिली फक्त शिवसेना. शिवसेनेने प्रत्येक संकटामध्ये आधार देण्याचे काम केले. म्हणूनच सामान्य जनता शिवसेनेच्या पाठिशी उभी आहे. भाजपा हा लबाडांचा, कावेबाजांचा आणि काड्या करणारांचा पक्ष आहे. त्यांनी कितीही काड्या करू द्या राज्यातील विंधान परिषदेच्या सहाही जागेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल, आ.सतिष चव्हाण यांचा विजय पन्नास हजारापेक्षा जास्त मताने होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शिवसेनेची अवहेलना करणा-या भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी उरलेला आजचा दिवस शर्थीने काम करायचे आहे. मतदारांच्या गाठीभेटी घ्या, जास्तीत जास्त मतदान करून घ्या असे त्यांनी म्हटले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, शिवसेना जिल्हा संघटक नितिन धांडे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, जिल्हा परिषद सदस्य गणपत डोईफोडे,अरुण डाके शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीताताई चव्हाण, परमेश्वर सातपुते, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, रतन गुजर यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते,नगरसेवक,पदवीधर मतदार बंधू भगिनी नियमांचे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते

पराभवानंतर विजयाचे अनुभव आहेत-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

निवडणूका अनेक लढल्या आहेत एका पराभवाने खचून जाणा-यापैकी आम्ही नाहीत पराभवानंतर अनेक वेळा तीन-तीन वेळा विजय मिळाल्याचे अनुभव आमच्या गाठीशी आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे आघाडीचा धर्म पाळून आज आम्ही सतीश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत केवळ विकासासाठी बरोबर राहणे हेच आमचे राजकारण आहे आम्ही कुणाचे नाव घेणार नाहीत परंतु ज्यांना निवडून दिले त्यांचेच शिलेदार आज पश्चाताप करत आहेत,विकास कामे करणारा प्रतिनिधी हवा की विकासात खोडा घालणारा हवा हे जनतेने ओळखले पाहिजे असे सांगून नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी आमदार चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन केले