महाराष्ट्रमुंबई

खासगी बस वाहतुक संपूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हिरवा कंदील:सरकारने केली नियमावली जाहीर

मुंबई : खासगी बसवाहतूक संपूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून देखील करण्यात येत होती. अखेर, राज्य सरकारने खासगी बस वाहतुकीलाही हिरवा कंदील दिला आहे.
राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु खासगी बस वाहतूकीसाठी देखील सरकारने नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बसमध्ये मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही तसेच गाडीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. प्रवासाच्या अगोदर सर्व प्रवाशांचे तापमान मोजणे बंधनकारक आहे.
ताप, सर्दी, खोकला असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून खासगी बसवाहतूक पूर्णपणे बंद होती. मिशन बिगीन अंतर्गत सरकारने 50 टक्के प्रवासी क्षमतेने बस चालवण्याची परवानगी दिली होती. खासगी बस वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडूनही संपूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर परवानगी मिळाली.

काय आहेत अटी?

प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक

बसचे चौकशी कक्ष, तिकीट घर यांची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

बस जिथे उभ्या असतात तिथे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.

मास्क न घालणाऱ्या तर प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी अतिरिक्त मास्क ठेवावे.

बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे थर्मल गनद्वारे तापमान मोजणे आश्यक आहे. एखाद्या प्रवाशाला ताप, सर्दी, खोकला असल्यास प्रवासाची परवानगी नाही.

चालकाने जेवण, प्रसाधनगृह यासाठी बस थांबवताना स्वच्छ ठिकाणी बस थांबवावी.

बसमध्ये चढताना, उतरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.